Wednesday, November 28, 2007

आयुष्यावर बोलू काही (२००३)

अताशा असे हे मला काय होते ?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?



गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - सलील कुलकर्णी
अल्बम - आयुष्यावर बोलू काही (२००३)

No comments: